औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २६ ते ३० जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २६ व २७ जुलै २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात तर दि. २८ ते ३० जुलै २०२३ तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ८६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २४ ते २९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. २५ व २६ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ३० जुलै ते ०५ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

वाढीची अवस्था

सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २० दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ % + इमाझामॉक्स ३५ % डब्ल्यूजी २ ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन व जमिनीत ओलावा असताना फवारणी करावी.

खरीप ज्वारी

वाढीची अवस्था

खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच खरीप ज्वारी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता ४० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.

बाजरी

वाढीची अवस्था

बाजरी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच बाजरी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २० किलो तर भारी जमिनीत ३० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.

खरीप भुईमूग 

वाढीची अवस्था

खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व रिमझिम पाऊस असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

आद्रक

वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच आद्रक पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. 

हळद

वाढीची अवस्‍था

हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. तसेच हळद पिकामध्ये माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित व प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा. माती परीक्षण केलेली नसल्यास ६ आठवडे झालेल्या पिकास नत्राचा शिफारसीत दुसरा हप्ता शेतात वापसा असताना देऊन बेडला हलकी भर द्यावी.   

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतीबंधात्मक उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान तसेच वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे डाळिंब बागेत तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा ब्रॉनोपॉल ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६. % ओडी १८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ % डब्ल्यूपी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच मिरची पिकामधील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के  ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

तुती रेशीम

पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९ टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान २८  व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५ व ६५ टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते. त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३ टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे स्वच्छता जाळया, आच्छादन जाळया २ टक्के फॉरमॅलीन मध्ये ‍निर्जंतुकीकरण करुन उन्हात वाळवुन वापरावे.  

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच  शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.

सध्यस्थितीत कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेडमध्ये नवीन भुसा टाकून घ्यावा तसेच शेडमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शेडच्या भोवताली चुना टाकून घ्यावा जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल.

इतर

तणनाशकांची फवारणी करत असताना जमिनीत ओलावा तसेच वापसा बघून करावी. तणनाशकाची फवारणी जोराचे वारे व पाऊस चालू असताना करू नये तसेच २-३ तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला