छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ मार्च ते ०२ एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे, स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३७.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २० ते २८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते १६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ मार्च ते ०६ एप्रिल २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.तसेच हंगामी ऊस पिकाची लागवड करून दीड महिन्‍याचा कालावधी झाला असल्‍यास १०० किलो नत्र प्रती हेक्‍टरी युरीयाव्‍दारे दयावे. तसेच ऊस पिकामध्ये खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त दिसून येत असल्यास क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के  एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी बाजरी

फुटवे अवस्था

बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

कांदा

परिपक्वता ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून घ्यावी.काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट  १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आंबा फळबागेतील झाडांच्या आळ्यामध्ये गवत, पालापाचोळा इत्यादी आच्छादनांचा वापर करून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच टोमॅटो पीकामधील फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.

इतर

सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी पिकांना पाणी देण्याची व फवारणीची तसेच शेतातील इतर कामे सकाळ व सायंकाळच्या वेळेस करावीत.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला