छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १२ ते १६ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १६ ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी. तसेच अद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हळद

कंद वाढीची अवस्था

हळद पिकामध्ये तण नियंत्रण करून हलकी भर द्यावी. तसेच हळद पीकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा

पेरणी ते रोप अवस्था

बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी.

जवस

पेरणी ते रोप अवस्था

शेतकरी बांधवांनी १५ नोव्हेंबर पर्यंत बागायती जवस पिकाची पेरणी करून घ्यावी.

बटाटा

रोप ते वाढीची अवस्था

बटाटा पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

मोसंबी

वाढीची अवस्था

नवीन लागवड केलेल्या मोसंबी रोपांमध्ये जमिनीलगत अतिओलाव्यामुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन रोपांची पाने पीवळी पडुन गळत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी खोडालगत ५ ते १० सेमी पर्यंत माती लावुन लगेच कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी. मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावुन घ्यावे.

डाळिंब

वाढीची अवस्था

सद्यस्थितीत डाळिंब बागेमध्ये पीनहोल बोरर या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी ४ किलो लाल माती (काव) + इमामेक्टीन बेन्झोएट  ५ एसजी २० मिली + कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम १० लीटर पाणी घेवून द्रावण तयार करुन झाडांच्या खोडास लावावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मिरची पिकात फळकुज, फांद्या वाळणे किंवा पानावरील ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन  याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायफेनकोनॅझोल ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

सद्यस्थितीमध्ये  थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत थंडी मध्ये वाढ होत असुन कुकुट पालन करणाऱ्या शेतकरी बांधवानी कोंबड्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब  जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरुन थंडीमूळे येणार ताण कमी होण्यास मदत होईल.

इतर

आवळयामध्ये न्टीऑक्सीडन्ट व जीवनसत्व क भरपुर प्रमाणात असल्यामुळे त्याचे मुल्यवर्धन करुन आवळयापासून आवळा लोणचे, आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा मुरंबा इत्यादी मूल्यवर्धित पदार्थाची निर्मिती करता येते.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments