औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १२ ते १६ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. १२ जुलै २०२३ रोजी विखुरलेल्या स्वरुपात तर दि. १३ ते १६ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ८२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. ११ १२ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. १६ ते २२ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

बीजप्रक्रिया  व पेरणी

सोयाबीन पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असल्यास तसेच जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असल्यास पेरणी करायला हरकत नाही.

सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ X ५ सें.मी. ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास २-३ ग्रॅम बावीस्टीन + ३-४ ग्रॅम थायरम व त्यानंतर ०५ मिलि प्रति किलो याप्रमाणे ब्रॅडीराझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. त्‍यानंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ३० किलो नत्र ६० किलो स्फुरद  व ३० किलो पालाश दयावे. तसेच सोयाबीन पिकामध्ये तणनाशक पेंडीमिथॅलीन ०.७५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणीपूर्वी फवारावे.

खरीप ज्वारी

बीजप्रक्रिया  व पेरणी

शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असल्यास तसेच जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असल्यास पेरणी करायला हरकत नाही.

ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी ७.५ किल्लो संकरित व १० किल्लो सुधारित प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १२.५ से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ३०० मेस सल्फर २.५ ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच अझॅटोबॅक्टर + पीएसबी ५ मिलि प्रती किलो प्रमाणात बिजप्रक्रीया करूनच जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी करावी. तसेच खरीप ज्‍वारीस ४० किलो नत्र, ४० किलो स्‍फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्‍टरी पेरणी करताना दयावे.

बाजरी

बीजप्रक्रिया  व पेरणी

बाजरी पिकाची पेरणी २० जुलैपर्यंत करता येते. शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असल्यास तसेच जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असल्यास पेरणी करायला हरकत नाही.

बाजरी पिकाच्या पेरणीसाठी ३ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १० से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्‍झील प्रती किलो व त्यानंतर अझोस्पिरिलम व स्‍फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धनाची १० मिली प्रती किलो बिजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच पिकास हलक्‍या जमिनीत ४०:२०:२० व मध्‍यम ते भारी जमिनीत ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्‍फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना दयावे.

खरीप भुईमूग 

बीजप्रक्रिया  व पेरणी

शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असल्यास तसेच जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असल्यास पेरणी करायला हरकत नाही.

भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी १०० ते १२० किलो (उपट्या) तर ८० ते १०० किलो (पसऱ्या) प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर  ३० x १० से.मी व  ४५ x १५ से. मी. ठेवावे. पेरणीपूर्वी २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी ची प्रती १० किलो बियाण्‍यास बिजप्रक्रिया करूनच जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच  भुईमूग पिकास २०:५०:००  नत्र : स्‍फुरद : पालाश  संपूर्ण खतमात्रा पेरणी करताना दयावे.  

आद्रक

वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. 

हळद

वाढीची अवस्‍था

हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. 

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावले नसल्यास लावून घ्यावे. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी एका प्लास्टिकच्या बकेटमध्ये १ किलो कॉपर सल्फेट ( मोरचूद ) ५ लिटर पाण्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. तसेच दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये १ किलो चुना ५ लिटर पाण्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकत्रित मिसळून घेतल्यानंतर तयार झालेले बोर्डो मिश्रण १२ तासाच्या आत वापरावे.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीच्या व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रीनिलिप्रॉल (१८.५% ईसी) ७.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मिरची पिकामधील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० % ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात  मिसळून आळवणी करावी. भाजीपाला पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

पावसाळयात ढगाळ वातावरणात संगोपन गृहातील तापमान २२ अं.से ते २८ अं.से. च्या दरम्यान ठेवावे आणि आर्द्रता ८० ते ८५ टक्के ठेवावी. जास्त तापमान व आर्द्रता राहिल्यास रेशीम किटकांवर ग्रासरी रोगाचा प्रादूर्भाव जाणवतो. किटकांचे (अळीचे) शरीर सुजल्यासारखे होते. दूधाळ द्रव बाहेर पडतो. रॅकवर जास्त ओला पाला जास्त प्रमाणात टाकु नये. फांदया खादय आवश्यकतेप्रमाणे दिवसातुन तीन वेळा दयावे. दोन कोषाच्या पिकाच्या दरम्यान आठ दिवसाचा खंड ठेवावा आणि निर्जंतुकीकरण द्रावण २०० मिली प्रति चौरस मीटर याप्रमाणे संगोपन गृहाच्या आत चारही बाजूने व रॅकवर फवारुन घ्यावे. असे ५० ग्रॅम १०० लिटर पाण्यासोबत किंवा सॅनिटेक (क्लोरीन डायऑक्साईड) २.५ टक्के किंवा २ टक्के ब्लीचींग पावडर + चूना द्रावण ०.३ टक्के (१० लिटर मध्ये २०० मिली ब्लीचींग पावडर + ३० ग्रॅम चूना द्रावण) प्रमाणे फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत शेळ्या व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.

इतर

शेतक-यांनी पीकांची पेरणी बीज प्रक्रिया करूनच करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक व जैविक खते याप्रमाणे करावी.  

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला