छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ एप्रिल २०२३ साठी हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहुन दि. १९ ते २१ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २५ ते ६५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २३ ते २९ एप्रिल २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
मोसंबी
फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट १५ मिली किंवा थायमिथोक्झाम ३.० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन ५ ग्रॅम किंवा ब्रॉनोपॉल ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावर पांढ-या माशीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फेन्प्रोपॅथ्रीन ३० ईसी ३.५ मिली किंवा पायरीप्रॉक्झीफेन १० टक्के ईसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळधारणा झालेल्या टोमॅटो पिकामध्ये काठी व दोरीच्या सहाय्याने आधार दयावा. तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे.
तुती रेशीम
रेशीम कोष काढणीनंतर कोष वाळवून साठवून ठेवण्यासाठी कडक उन्हामध्ये पातळ सुती कपड्याचे आच्छादन करून वाळवावे. मुंग्यांच्या प्रादुर्भावापासून कोशाचे संरक्षण करावे.पाच दिवस कोष वाळल्यानंतर साठवणुकीच्या घरात व बारदाण्यावर डेल्टामेथ्रीन ४ मिली प्रति १० लिटर पाण्यत मिसळून फवारावे.
पशुसंवर्धन
तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन सर्व शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे.
तसेच सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच जनावरांना पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे.
इतर
शेतकरी बांधवांनी रब्बी पिकांच्या काढणीनंतर शेतातील धसकटे, काडीकचरा गोळा करुन जमीन स्वच्छ करुन घ्यावी. तसेच मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment