औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०५ ते ०९ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. ०५ जुलै २०२३ रोजी व्यापक तर दि. ०६ ते ०९ जुलै २०२३ रोजी विखुरलेल्या स्वरुपात अतीशय हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ८१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. ०४ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०९ ते १ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

सोयाबीन पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ X ५ सें.मी. ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास २-३ ग्रॅम बावीस्टीन + ३-४ ग्रॅम थायरम व त्यानंतर ०५ मिलि प्रति किलो याप्रमाणे ब्रॅडीराझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. त्‍यानंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ३० किलो नत्र ६० किलो स्फुरद  व ३० किलो पालाश दयावे. तसेच सोयाबीन पिकामध्ये तणनाशक पेंडीमिथॅलीन ०.७५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणीपूर्वी फवारावे.

खरीप ज्वारी

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

खरीप ज्वारी पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी ७.५ किल्लो संकरित व १० किल्लो सुधारित प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १२.५ से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ३०० मेस सल्फर २.५ ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच अझॅटोबॅक्टर + पीएसबी ५ मिलि प्रती किलो प्रमाणात बिजप्रक्रीया करूनच जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी करावी. तसेच खरीप ज्‍वारीस ४० किलो नत्र, ४० किलो स्‍फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्‍टरी पेरणी करताना दयावे.

बाजरी

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

बाजरी पिकाची पेरणी २० जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

बाजरी पिकाच्या पेरणीसाठी ३ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १० से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्‍झील प्रती किलो व त्यानंतर अझोस्पिरिलम व स्‍फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धनाची १० मिली प्रती किलो बिजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच पिकास हलक्‍या जमिनीत ४०:२०:२० व मध्‍यम ते भारी जमिनीत ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्‍फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना दयावे.

खरीप भुईमूग 

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

भुईमुग पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी १०० ते १२० किलो (उपट्या) तर ८० ते १०० किलो (पसऱ्या) प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर  ३० x १० से.मी व  ४५ x १५ से. मी. ठेवावे. पेरणीपूर्वी २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी ची प्रती १० किलो बियाण्‍यास बिजप्रक्रिया करूनच जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच  भुईमूग पिकास २०:५०:००  नत्र : स्‍फुरद : पालाश  संपूर्ण खतमात्रा पेरणी करताना दयावे.

आद्रक

लागवड

पाण्याची उपलब्धतेनुसार आद्रक पिकाची लागवड करून घ्यावी.

हळद

लागवड

पाण्याची उपलब्धतेनुसार हळद पिकाची लागवड करून घ्यावी.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावले नसल्यास लावून घ्यावे. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी एका प्लास्टिकच्या बकेटमध्ये १ किलो कॉपर सल्फेट ( मोरचूद ) ५ लिटर पाण्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. तसेच दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये १ किलो चुना ५ लिटर पाण्यात मिसळून रात्रभर भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकत्रित मिसळून घेतल्यानंतर तयार झालेले बोर्डो मिश्रण १२ तासाच्या आत वापरावे.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीच्या व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रीनिलिप्रॉल (१८.५% ईसी) ७.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

सद्याच्या वातावरणामुळे मिरची पिकामध्ये रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा इत्यादी) किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

संगोपन गृहात ढगाळ पावसाळी वातावरणात आर्द्रता ८५ टक्क्यापेक्षा जास्त जाते. संगोपन गृहात आर्द्रता ८५ टक्केच्या वर जाता कामा नये. तेव्हा तुती पाने खाद्य देण्या अगोदर दोन तास कापून उभे ठेऊन साठवणूक करावी व त्यावर ओळ गोणपाट झाकून ठेवावा. म्हणजे पानातील ओलावा टिकून राहील. रॅकवर जास्तीचे फांद्या खाद्य ठेऊ नये. आवश्यक तेवढेच खातील तसे दिवसातून कमीत कमी तीन वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे. कात अवेस्थेत  रॅकवरील बेड कोरडा ठेवण्यासाठी चुना धुरळणी करावी व कातेतून कीटक बाहेर पडताना विजेता निर्जंतुक पावडरची धुरळणी करावी. स्वच्छतेचे पालन करावे. फांद्यांना धूळ किंवा बाहेरचे रोग प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

पशुसंवर्धन

पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण करावे. पावसामुळे गोठ्यात पाणी साचून राहिल्यास जनावरांमध्ये रोग वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पशुपालकांनी गोठा सर्व बाजूने समतोल करून पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

इतर

सोयाबीन पीकांची पेरणी करतांना शेतक-यांनी रुंद सरी वाफा वरंबा (बीबीएफ) यंत्राचा वापर करावा.जेणेकरुन वाफयामधील साचलेले अतिरिक्त पावसाचे पाणी वाहून जाते तर कमी पाऊस झाल्यास मुलस्थानी जलसंधारण होऊन ओलावा टिकुन राहून अधिक उत्पन्न मिळते.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला