औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून  दि. १३ व १४ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या तर दि. १५ ते १७ सप्टेंबर २०२३ ब-यापैकी व्यापक ते व्यापक स्वरुपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६२ ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी हलक्या ते मध्यम तर दि. १५ व १६ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. १७ ते २३ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिली किंवा फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावासाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

खरीप ज्वारी

दाणे भरणे अवस्था

पक्षांपासुन ज्वारी पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

बाजरी

दाणे भरणे अवस्था

पक्षांपासुन बाजरी पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

खरीप भुईमूग 

दाणे भरणे ते परिपक्वता

काढणीस तयार असलेल्या भुईमुग पीकाची काढणी करुन घ्यावी. काढणीनंतर शेंगाना ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २० मिली किंवा क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

मागील काही दिवसांमधील दमट व ढगाळ वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून गाळ झालेली फळे वेचुन नष्ट करावीत तसेच फळमाशीकरिता कामगंध सापळे (मिथाईल युजेनॉल) एकरी चार ते पाच प्रमाणात लावावेत व मॅलॅथिऑन ५० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. 

डाळिंब

फळ वाढ ते काढणी अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये फायटोप्थोरा बुरशीमुळे मर दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झिल ८ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकामध्ये पर्णगुच्छ/बोकड्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी, रोगट झाडे उपटुन नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायमिथोएट किंवा इमिडाक्लोप्रिड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसाच्या अंतराने २-३ फवारण्या स्वच्छ वातावरणात कराव्यात.

तसेच मागील काही दिवसांमधील दमट वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ( ५०टक्के डब्लूपी) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावासाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे.रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते वेळी अर्धा तास अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ घालण्या अगोदर अर्धा ते एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना खादय दयावे.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत गोवंशीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

इतर

शेतकरी बांधवांनी शेतामध्ये किड व ‍किटकनाशके फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बादल्या, डब्बे, पाकीटे इत्यादीं तलाव, नद्या तसेच सार्वजनिक पाणवठयामध्ये न धूता त्यांची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी. जेणेकरुन या औषधांपासून जनावरांना होणारी विषबाधा रोखता येईल.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला