छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०८ ते १२ मे २०२४ साठी हवामान अंदाज व कषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. ११ मे २०२४ रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ४०.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १३ ते ५० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. १२ ते १८ मे २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ
राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
दाणे भरणे अवस्था
सध्यस्थितीतील तापमानातील वाढीमुळे मका
पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
मोसंबी
वाढीची अवस्था
सध्यस्थितीतील तापमानातील वाढीमुळे मोसंबी बागेस पाण्याचा ताण
बसणार नाही याची काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत
ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या आच्छादनाचा वापर करावा. तसेच नवीन
लागवड केलेल्या बागेमधील रोपांना सावली
करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल.
डाळिंब
वाढीची अवस्था
सध्यस्थितीतील तापमानातील वाढीमुळे डाळिंब
बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे तसेच बागेत पिकांचे अवशेष/गवताचे आच्छादनाचा वापर करावा. तसेच नवीन
लागवड केलेल्या बागेमधील रोपांना सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर
उन्हापासून संरक्षण होईल.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
टोमॅटो पिकावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली + करंज
तेल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला
पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे. तसेच भाजीपाला पिकाची काढणी शक्यतो सकाळी व सायंकाळच्या वेळेस
करावी.
तुती रेशीम
रेशीम किटक
संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून
कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक
पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
तापमानातील वाढ लक्षात घेता शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण
करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच वाळलेल्या चा-यापेक्षा
हिरव्या चा-यामध्ये २ ते ३ पट अधिक स्फुरदाचे प्रमाण असते. त्यामुळे शेतक-यांनी
सद्यस्थितीत जनावरांच्या आहारात वाळलेल्या चा-यासोबत हिरव्या चा-याचा समावेश
करावा. जेणेकरुन जनावरांमधील स्फुरदाचे
प्रमाण योग्य राखले जाईल.
कोंबडयांच्या
शेडमधील तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व
पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून
कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.
इतर
शेतकरी बांधवांनी रब्बी पिकांच्या काढणीनंतर शेतातील धसकटे,
काडीकचरा गोळा करुन जमीन स्वच्छ करुन घ्यावी. तसेच मागील दोन वर्षी नांगरणी केली
नसल्यास खोल नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून
जमीनीतील किड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment