छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ जुन २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दि. २० व २१ जून २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०
ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ जुन ते ०१ जुलै २०२५ दरम्यान
हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तर कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
पुर्वमशागत व वाणांची निवड
आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी
करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२,
कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी.
कापूस
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
कापूस पिकाच्या लागवडीसाठी ३.० ते ४.० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व
लागवडीतील अंतर ९० X ६० किंवा ६० X ६० किंवा ६० X ३० किंवा ४५ X ३० सेमी ठेवावे. लागवडीपूर्वी
थायरम किंवा कॅप्टन ३.० ग्रॅम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. बीजपक्रियेनंतर
बीयाणे सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड करावी. कोरडवाहू कपाशीस लागवडीच्या अगोदर किंवा
लागवडीच्या वेळेस खतांची पहिली मात्रा ६०:६०:६० किलो प्रति हेक्टर नत्र, स्फुरद व पालाश रेघाटयावर पेरून द्यावे.
मका
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
मका पिकाच्या लागवडीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील
अंतर ६०X ३० ठेवावे. पेरणी/लागवडपूर्वी
ट्रायकोडर्मा ०५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.तसेच सायन्ट्रीनिलीप्रोल +
थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावे.
जेणेकरुन लष्करी अळीचे व्यवस्थापन होईल व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर
आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. बीजपक्रियेनंतर बियाणे
सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड/पेरणी
करावी. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो
स्फुरद व ७५ किलो पालाश दयावे. मका पिकाची लागवड झाल्याबरोबर त्याच दिवशी किंवा
दुसऱ्या दिवशी ऊगवणीपूर्व तणनाशक (अट्राझिन ५० डब्ल्यू पी) १.५ किलो प्रति हेक्टर
७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी केल्यास तणव्यवस्थापन होते.
तूर
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
तूर पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी १.५ - २.० ग्रॅम बावीस्टीन अथवा २.५ ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति
किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी.
बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना
लागवड/पेरणी करावी. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो
नत्र ५० किलो स्फुरद दयावे.
मूग/उडीद
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
मूग/उडीद पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व
पेरणीतील अंतर ३० X १० सेमी ठेवावे.
पेरणीपूर्वी १.० ग्रॅम कार्बेडेंझीम अथवा २.० ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति
किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी.
बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना
पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५
किलो नत्र ५० किलो स्फुरद दयावे.
सिताफळ
सिताफळ बागेतील सूत्रकृमींचा व मातीतून होणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी
निंबोळी पेंड ५०० ग्रॅम प्रति झाडास द्यावे.
आंबा
आंबा फळबागेतील खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगे हाताने गोळा करून
नष्ट करावेत व हेक्टरी २-३ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
भाजीपाला
पुर्नलागवड
टोमॅटोची रोपे लावताना टोमॅटो पिकाच्या बाजूने ने व टोमॅटोच्या १६ ओळींनंतर
एक ओळ झेंडूची लावावी त्यामुळे फळ पोखरणारी अळी झेंडूकडे आकर्षित होऊन पिकाचे रक्षण
होते.
चारा पिके
वाणांची निवड
खरीप हंगामातील मका चारा पिकाच्या लागवडीसाठी आफ्रिकन टॉल,विजय,गंगा सफेद,डेक्कन
हायब्रीड,इत्यादी वाणाची निवड करावी.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवांनी जनावरांना जंतांच्या व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास,
गोमाशी इत्यादी) नियंत्रण करावे. पावसामुळे
गोठ्यात पाणी साचून राहिल्यास जनावरांमध्ये रोग वाढण्याची शक्यता जास्त असते
त्यामुळे पशुपालकांनी गोठा सर्व बाजूने समतोल करून पाणी साठून राहणार नाही याची
काळजी घ्यावी.
इतर
शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय
तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
Comments
Post a Comment